कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनगणना मोहीम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्राच्या व्यापक नियोजनासाठी जनगणना आवश्यक आहे. ही जनगणना करताना सर्वांनी काळजीपूर्वक काम करावे. यात कोणते प्रकारे त्रुटी रहाता कामा नये. कोल्हापूर जिल्ह्याच्या परंपरेला जोपासत जनगणना मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी अशा शब्दात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज उपस्थित प्रशिक्षणार्थांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याच्या अंतिम दिवशी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, कोल्हापूर मनपा उपायुक्त परितोष कंकाल, इचलकरंजी मनपा उपायुक्त नंदू परळकर, करमणूक कर अधिकारी तेजस्विनी पाटील, तहसीलदार हनुमंत म्हेत्रे, जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित, समन्वयक मयूर पवार, ना. तहसिलदार नितीन धापसे-पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जनगणना दोन टप्प्यात असून यातील पहिला टप्पा मे-जून 2026 तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे यासाठी सर्व न.पा. मुख्याधिकारी, तहसीलदार आणि मनपाच्या चार्ज ऑफिसर (CO) नी कार्यरत राहावे.अशी सूचना करून जिल्ह्यात जनगणना कक्ष सुरू करण्यात आला असून मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच डिजिटल जनगणना असल्याने यात अचूकता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी जनगणना कशा पद्धतीने मोजावयाची याबाबतीत प्रगणकांसाठी बनवण्यात आलेल्या नियमावलीचे सादरीकरण श्री. दीक्षित यांनी केले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार न. पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित लिपिक – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











