‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ शिबिरातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ

वैभववाडी (प्रतिनिधी) :शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रशासन आता तुमच्या दारापर्यंत येत असून या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत खांबाळे केंद्र शाळेत आयोजित शिबिरात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सिद्धेश रावराणे, सरपंच प्राजक्ता कदम, नायब तहसीलदार दिलीप पाटील, सचिन निकम, उपाधीक्षक भूमी अभिलेख सचिन गवारी, सहायक दुय्यम निबंधक निर्मिती जाधव, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, शिवाजी सुतार, सहायक महसूल अधिकारी नागावकर, मंडळ अधिकारी दिलीप ठाकूर, तलाठी केदारी बागल, तलाठी श्री. गोडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध खात्यांमध्ये अधिकारी पदे भरलेली असल्याने नागरिकांना सेवा लवकर मिळू शकते. तरीही ग्रामस्थांच्या काही शंका असल्यास त्यांनी संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले.
गावातील अनेक नागरिकांचे वारस तपास प्रकरणे प्रलंबित असून त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. तसेच कुळवहिवाट वर्ग दोनमधील जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दुय्यम निबंधक निर्मिती जाधव यांनी ग्रामस्थांना जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात जमीन खरेदी-विक्री व्यवहाराचे दस्तऐवज नोंदणी करता येतात, अशी माहिती दिली. तर तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनी शासनाच्या विविध वीज योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ‘अ‍ॅग्री स्टॅक फार्मर आयडी’ काढणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या शिबिरात नवीन रेशनकार्ड, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत १८५ वारस तपास प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार पेन्शन योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली. तगाई बोजा असलेल्या ग्रामस्थांचा बोजा कमी करून त्यांना सातबारा उतारे देण्यात आले. अशा विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांना या शिबिरातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी श्री. गोडे यांनी केले.

error: Content is protected !!