‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत दख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा संपन्न

यात्रेत गर्दी आणि वाहतुक नियंत्रणासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर

पावसाची मेघगर्जनेसह मुसळधार हजेरी आणि प्रशासकीय दक्षता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड जयघोषात, गुलालाच्या न्हाऊन निघालेल्या वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा आज अमाप उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झाला. प्रविण डबाणे यांनी तोफेची सलामी दिल्यानंतर, विविध रंगी सुगंधी फुलांनी सजवलेली पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी एकाच वेळी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगर चैतन्यमयी ‘गुलालमय’ झाला.

मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा गजगतीने मूळमाया यमाई देवीच्या मंदिराकडे रवाना झाला. मार्गावर भाविकांनी पालखीवर गुलालाची उधळण करत दर्शन घेतले. यमाई मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर तिथे यमाई देवीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता.

रात्री पालखी सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात परतला. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी आणि केदार डवरी यांनी पारंपारिक डवरी गीते सादर केली. या गायनानंतर पालखीने मुख्य मंदिरात प्रवेश केला आणि सोहळ्याची सांगता झाली.

पावसाची हजेरी आणि प्रशासकीय दक्षता
दरम्यान, दुपारी ४:०० च्या सुमारास जोतिबा डोंगर परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसात चिंब भिजूनही भाविकांचा उत्साह कायम होता. पावसामुळे रस्त्यावर साचलेला गुलाल आणि चिखलामुळे निर्माण झालेली निसरडी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या, जेणेकरून भाविकांना चालताना कोणताही त्रास होणार नाही. जिल्हा शासनाच्या वतीने यात्रेनिमित्त चोख बंदोबस्त आणि सुविधा पुरवण्यात आल्या असून भाविकांनी शांततेत दर्शन घेतले.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रकल्प
कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा यात्रेसाठी दरवर्षी ७ ते ८ लाख भाविक सलग हजेरी लावतात. लाखो भाविकांना जोतिबाचे दर्शन अधिक सुरक्षित आणि सुखकर पद्धतीने घेता यावे, या अलोट गर्दीचे चोख नियोजन करण्यासाठी आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंदा ‘आयआयटी मंडी’च्या तज्ज्ञांच्या मदतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबवला. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे यात्रेतील गर्दीवर सलग लक्ष ठेवणे आणि वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य झाले.

error: Content is protected !!