“थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; कर्मचाऱ्यांकडून नितेश राणेंना मनापासून आभार”
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपल्या समस्या मांडल्यानंतर त्या सुटाव्यात, ही प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते. मात्र त्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर कृतज्ञतेने पुन्हा भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद — हा कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी सर्वात मोठा सन्मान ठरतो. असाच हृदयस्पर्शी अनुभव शनिवारी झालेल्या नागरिक संवाद कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी अनुभवला. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून थकीत राहिलेला पगार हा गंभीर प्रश्ना मागील संवाद कार्यक्रमात समोर आला होता. संबंधित ठेकेदार कंपनीकडून वेतन वेळेत दिले जात नसल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. या वेदनेची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला.
आपला प्रश्न सुटल्याचा आनंद आणि समाधान मनात साठवून युगंधर तेंडोलकर, गौरेश केळुसकर, रोशनाली परब, श्रमिका मस्के, वैभवी चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी ही भेट घेतली. सर्व कर्मचारी खास सिंधुदुर्गनगरीत दाखल झाले. संवाद कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत कृतज्ञतेने आभार मानले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, डोळ्यांतली समाधानाची चमक आणि मनापासून व्यक्त झालेली भावना — हे दृश्य उपस्थितांसाठीही भावूक करणारे ठरले. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास — याच भावनेतून लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नातं अधिक घट्ट होत असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.












