खा. नारायण राणेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती

कणकवली येथे १० एप्रिल रोजी अपूर्व उत्साहात साजरा होणार वाढदिवस

राज्यातील मंत्री,नेते यांच्यासह पार्श्वगायक सोनू निगम सिने अभिनेता संजय दत्त यांची असणार प्रमुख उपस्थिती

सायंकाळी ६ वाजता नारडवे नाका येथे होणार वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्या’ने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष वलय प्राप्त झाले आहे.

राज्याच्या राजकारणात अत्यंत आक्रमक, करारी आणि तितकेच विकासाभिमुख नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खा. नारायण राणे यांच्या कारकिर्दीला सात दशके पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समिती’तर्फे कणकवली येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणचा सर्वांगीण विकास, विशेषतः पर्यटन, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान या सोहळ्यात अधोरेखित केले जाणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. राणे आणि फडणवीस यांचे राजकीय संबंध आणि महायुतीमधील त्यांचे महत्त्व पाहता, हा सोहळा केवळ कौटुंबिक किंवा वैयक्तिक न राहता त्याला मोठे राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

error: Content is protected !!