“शौर्य, शिस्त आणि समर्पण – हाच मेजर कौस्तुभ राणे यांचा अमर वारसा!” या प्रेरणादायी संदेशासह जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा – आयोजकांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शौर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्यासाठी भव्य जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा खुल्या गटात होणार असून “हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचे शौर्य, शिस्त आणि समर्पण” हा निबंध लेखनाचा विषय देण्यात आला आहे. निबंधाची शब्दमर्यादा ८०० ते १००० शब्द इतकी आहे. या स्पर्धेत विद्यार्थी, युवक तसेच लेखनाची आवड असलेल्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिके अनुक्रमे ३०००, २०००, १००० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. आपल्या स्व हस्ताक्षरातील निबंध दि.३० जुलै २०२६ पर्यंत मंदार सदाशिव चोरगे, कलाशिक्षक अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी ता-वैभववाडी, जि-सिंधुदुर्ग, ४१६८१० या पत्यावर स्वतः किंवा पोस्टाने अथवा कुरिअर ने पाठवावे, अधिक माहितीसाठी मंदार चोरगे ९७६७२२२२४८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “शौर्य, शिस्त आणि समर्पण – हाच मेजर कौस्तुभ राणे यांचा अमर वारसा!” या प्रेरणादायी संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षक, लेखक व साहित्यप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना आपल्या लेखणीतून अभिवादन करावे, असे आवाहन आयोजक विजय रावराणे यांनी केले आहे.











