मडुरा–रोणापाल परिसरात बिबट्याची दहशत; दोन कुत्र्यांचा फडशा

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बांदा (प्रतिनिधी) : मडुरा व रोणापाल परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांची झोप उडाली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या दोन धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मडुरा येथील शेर्लेकरवाडीमध्ये दाजी सातार्डेकर यांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या दोन कुत्र्यांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. सातार्डेकर कुटुंबीय घरात जेवण करत असतानाच बिबट्याने क्षणात दोन्ही कुत्र्यांना उचलून नेले. घराजवळच ही घटना घडल्याने कुटुंबीय हादरून गेले. बिबट्याचा वावर थेट मानवी वस्तीपर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

दुसरी घटना रोणापाल येथील भरडवाडीमध्ये घडली. राजन परब हे सोमवारी रात्री घरी परतत असताना भरवस्तीतील रस्त्यावर त्यांना बिबट्या उभा असल्याचे
दिसले. अचानक समोर बिबट्या दिसल्याने ते घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या सलग घटनांमुळे मडुरा, रोणापाल आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास नागरिक धास्तावले असून शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

पिंजरे लावा, गस्त वाढवा
वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत तसेच रात्री गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!