खारेपाटण मध्ये पथ दिवे लावण्यास आम्ही सक्षम.. – महेंद्र गुरव, सरपंच
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर यांनी खारेपाटण शहरातील रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे स्थानिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे आपण लावले असल्याची बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. याला प्रतिउत्तर देताना खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी महेश उर्फ गोट्या कोळसुलकर हे राजकीय नपुंसक असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली असून खारेपाटण मधील पावसामुळे व विद्युत मंडळाचा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे बंद असलेले पथदिवे आम्ही लावण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे.
खारेपाटण मध्ये विद्युत मंडळाचे कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहे. खारेपाटण ग्रामपंचायत त्यांचे सहकार्य घेऊन महिन्यातून दोन वेळा बंद असलेले पथ दिवे लावण्याचे काम करत असते. मात्र हे कोळसुलकर यांना माहीत असून सुद्धा केवळ राजकीय स्टंट बाजी करण्यासाठी गावातील चार बल्ब लावून मोठे दिव्य साकार केल्याचे दाखवून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. खारेपाटण ग्रामपंचायत नागरिकांना प्राथमिक अत्यावश्यक सुविधा देण्यास बांधील असून दर महिन्याला सुमारे ५० ते १०० बल्ब बंद पडतात ते लावण्याचे काम ग्रामपंचात न चुकता करत आहे.
दरम्यान सध्या राजकीय अस्तित्वहीन झालेले व राजकीय नपुसंकत्व आलेले महेश कोळसुलकर हे गावात चार दिवे लावून मोठेपणाचा आव आणत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून ज्यांना स्वतःच्या पक्षाने देखील वाळीत टाकले. व भाजप पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असलेले कोळसुलकर यांना पालकमंत्र्यांनी स्पष्ट नकार दर्शविल्याने नैराश्य प्राप्त झाल्याने केवळ पब्लिकसिटी मिळविण्यासाठी ते राजकीय स्टंट बाजी करत असल्याचा आरोप सरपंच महेंद्र गुरव यांनी आपल्या प्रक्रियेत कोळसुलकर यांच्यावर केला आहे.
तसेच खारेपाटण गावातील सर्व ग्रामस्थांना कोळसुलकर याचा कावा माहित झाला असून ग्रामस्थ त्यांच्या अशा खोट्या भूल भुलैया प्रचाराला बळी पडणार नाहीत. तसेच उबठा शिवसेना गटाचे मूळ शिवसैनिक सुद्धा त्यांच्या अशा या कृती मुळे दूर गेले आहेत. तर हेच महेश कोळसुलकर उबाठा पक्षाचे स्वयंघोषित पुढारी आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात फोटोत येण्यासाठी निर्लज्जपणे मिरवून स्वतःचे व पक्षाचे हसे करून घेत आहेत.तर आमचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शनामुळे खारेपाटण ग्रामपंचायतीची योग्य रीतीने विकासाकडे वाटचाल सुरू असून कोळसुलकर सारख्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी आपली पात्रता ओळखून वक्तव्ये करावीत असे देखील सरपंच महेंद्र गुरव यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.












