“रानकवी” हरपले… ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन

सिंधुदुर्ग (ब्युरो न्युज) : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज त्यांनी प्राण सोडले.

ना धों महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना.धों. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!