विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता
प्रशासनाने योग्य तोडगा काढणे आवश्यक
चौके ( अमोल गोसावी ) : सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक योजनांचे लाभार्थी यांना जात कागदपत्र पुर्ततेमध्ये जात दाखला सक्तीने प्रशासनाकडून मागितला जात आहे. त्यानुसार विद्यार्थी , लाभार्थी नागरीक अथवा शेतकरी जात दाखला काढण्यासाठी सेतु सुविधा केंद्रांची मदत घेताना दिसत आहेत , पर्यंत बऱ्याच प्रकरणांमध्ये विद्यार्थी अथवा इतर लाभार्थी यांच्या पुराव्याच्या कागदोपत्री त्यांची आडनावे ही पुर्वी जातवाचक लावली जात असत , त्याप्रमाणे नमूद आहेत , आणि आता प्रत्येकजण आपल्या गावावरून आणि अन्य आडनावे नमूद करत आहेत तसेच नावातही किरकोळ बदल आहेत तसे प्रतिज्ञापत्र व स्थानिक पोलीस पाटील व सरपंच यांचे दाखले सादर करत आहेत. तरीही जात दाखला प्रकरणे प्रशासनाकडून रिजेक्ट केली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच काही कुटुंबात जात दाखला काढलेला नसतो तरी जात दाखले सादर करा म्हणून सांगितलं जातं, तसेच पुरावा धारक व्यक्ती मयत असल्याने गॅझेट होऊ शकत नाही तरी ते सादर करा असं सांगितलं जातं. अशा किरकोळ तांत्रीक अडचणींमुळे जात दाखले मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरी यावर प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य तो तोडगा काढून विद्यार्थ्यांना जात दाखले वेळेत देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे अशी मागणी विद्यार्थी व लाभार्थी यांच्याकडून होत आहे.












