सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ७५०० शेतकरी २०१४ पासून खाऊटी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले योजना तसेच छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना लाभापासून सुमारे ३६७७ शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी एकवटले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले आहे. तर जोरजोरत घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला.
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखापर्यंत चे कर्ज शासनाने माफ केले आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम पाहता २ लाखापेक्षा जास्त कर्ज दिसते अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहिले आहेत. तसेच शासनाने खावटी कर्जाचा विचार कर्ज माफी साठी केला आहे. मात्र मध्यम व अल्प कर्जाबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तसेच २०१४ पासून खावटी, मध्यम व अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, २०२२-२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच गेल्यावर्षी कोळी रोगामुळे सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे होऊनही त्याची भरपाई मिळालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र असंतोष पसरला असून याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील भात पीक, आंबा व काजू पीक उत्पादित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. याबाबत प्रशासनास निवेदन सादर केले आहे.
यावेळी शेतकरी आग्नेल फर्नांडिस, संदीप देसाई, संतोष पेडणेकर, महेश चव्हाण, अर्जुन नाईक आदीसह मोठ्या संखेने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.












