कणकवली येथील आरक्षण बचाव रॅलीला सर्वच स्तरातून पाठिंबा

आ नितेश राणे यांच्याच नेतृत्वात राज्यात झाले होते पहिले निषेध आंदोलन – प्रभाकर सावंत,जिल्हाध्यक्ष भाजपा

कणकवली (प्रतिनिधी) : आरक्षण विषयातील काँग्रेसचा खरा चेहरा आणि अंतर्मनातली भूमिका उघडी पाडण्यासाठी आमचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक ०५ ऑक्टोबर 2024 रोजी आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.या रॅलीला समाजाच्या सर्वच स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून अनेकजण याबाबत स्पष्टपणे व्यक्त होत आहेत.ही केवळ रॅली नसून आरक्षित समाजाची आत्मसानमची आरक्षण बचाव रॅली आहे.

राहुल गांधीचे आरक्षण विषयातील वक्तव्य समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यावर आ नितेश राणे यांनी लगेचच या विधानाची नोंद घेतली आणि प्रदेशात सर्वात पहिल्यांदा कणकवली येथे या वक्तव्याचा जाहीर निषेध केला .त्यानंतर संपूर्ण राज्यभर याबाबत निषेध आंदोलने करण्यात आली. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने देशवासीयांसाठी अपेक्षित विषयांवर सकारात्मक काम केले असल्याने,देशाची जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली.त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आपण भुईसपाट होऊ याची कल्पना काँग्रेस प्रणित आघाडीला झाली होती,त्यामुळे आमच्या चारसो पार या घोषणेचा विपरीत अर्थ देशातील सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे पाप काँग्रसने केले.काँग्रेसने भाडोत्री पिलावळीच्या साहाय्याने ‘संविधान खतरे मे ‘अश्या निगेटिव्ह नरेटीव्हच्या माध्यमातून कसाबसा आपला जीव वाचवला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी ज्यांना आरक्षणाचे अधिकार दिले. त्या देशातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आणि प्रवाहाबाहेरील जनतेला आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने भीतीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न केला.खरे तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केशवानंद भारती न्यायलयीन प्रकरणाआडून केला होता,मात्र सर्वोच्च न्यायालय यांनी भारतीय संविधान बाबत ऐतिहासिक निर्णय देत ते अधिकच सुरक्षित केले.हा इतिहास सर्वांना माहिती आहे.समाजातील विषमता नष्ट करून समान दर्जा प्राप्त करायचा असेल तर आरक्षण हे गरजेचे आहे आज भाजपा सरकारने या जनतेला आत्मसन्मान, आणि आदर दिला.त्यांना विकासाच्या मुख्य प्रक्रियेत आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार विविध क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे आरक्षित समाजाचा वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा मोदी सरकारला मिळत असल्याने भाजपा संविधान बदलणार असा खोटा प्रचार राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाने केला होता. संविधान बदलले तर आरक्षण ही जाईल अशी भीती घालण्यात आली.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांनी ही बाब केवळ एका निवडणुकीत स्वतःच्या फायद्यासाठी केली. आणि देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
पण खोटे मुखवटे जास्त काळ पांघरता येत नाहीत याचा प्रत्यय राहुल गांधींनी आपल्या अमेरिकेतील भाषणाने दिला.काँग्रेस पक्षाने नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि आंबेडकरी समाज,विचारधारा याचा सतत अवमान केला आहे.तोच वारसा राहूल गांधी आरक्षण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा याचा अवमान करून पुढे चालवीत आहेत हे अमेरिका दौऱ्यात देशाने आणि जगाने पाहिले.अशी अनेक उदाहरणं आहेत.
काँग्रेसला सत्ता मिळाल्यास काँग्रेसची भूमिका ही आरक्षण रद्द करण्याची राहील.या राहूल गांधी यांच्या विधानाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,भारतीय संविधान आणि आरक्षण प्रणालीतून उभारी घेणारी सामान्य आरक्षित जनता या सर्वांचा अवमान केलेला आहे.
आरक्षण हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे,त्यामुळे काँग्रसने कितीही मोठ्या चळवळी उभ्या केल्या तरी ही भारतीय जनता पार्टी ‘आरक्षण बचाव ‘ या भूमिकेतून संविधानाचा आदर करेल आणि पुढेही करत राहील. आरक्षण यामुळेच आरक्षित समाज आज प्रगती करत आहे.आमचे आरक्षण आमचे संरक्षण हीच भूमिका घेऊन मा नितेश राणे यांच्या नेतृत्वात उद्या आम्ही आरक्षण बचाव रॅली आयोजित केलेली आहे.या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!