मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठी भाषेला अभिजात दर्जा- मान्यता देण्याचे, केंद्र सरकारने जाहीर केले हे चांगलेच झाले. समस्त मराठी भाषकांना याचा आनंदच आहे. अभिजात दर्जाचे शिक्कामोर्तब व्हावे, म्हणून अनेक साहित्य संस्थानी गेली अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न केले. प्रेमानंद गज्वी आणि स्वतः मी अन सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या “अभिजात मराठी आणि बोलीभाषा संवर्धन समिती ” च्या अथक प्रयत्नांना यश मिळाले, याचा आम्हाला आनंद होत आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारचा जो निधी महाराष्ट्र शासनाकडे येईल,त्यातून मराठीच्या ६८ बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन होईल, अशी अपेक्षा आहे. असे सानंद मत अभिजात मराठी बोली भाषा संवर्धन समितीचे निमंत्रक. सिंधुदुर्ग सुपुत्र, जेष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केली आणि तमाम मराठी भाषिक आणि जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अकरा वर्षाच्या लढ्याला निवडणुकीच्या तोंडावर हे यश मिळाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून मराठी साठी महाराष्ट्र शासनाकडे येणारा निधी, चा उपयोग मराठीच्या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मराठी विभागाचे ज्येष्ठ- श्रेष्ठ साहित्यिक आणि संस्थानी करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य मधून व्यक्त होत आहे..