वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री धाकुबाई देवी प्रा. वारकरी सांप्रदाय भजन मंडळ मुंबई आणि आखवणे वरचीवाडी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किजळीचा माळ येथे,अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, माजी सभापती नासिर काझी आदी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी पाच ते सहा वाजता काकड आरती, सकाळी १० ते १२ वारकरी भजन, सायंकाळी ५. ३० ते ६. ३० वा.प्रवचन सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व रात्री ११ वा.नंतर जागर असे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत घटस्थापना करून सप्ताहची सुरुवात होणार आहे. सप्ताह निमित्त ह. भ. प. भास्कर महाराज भोगवे (मुंबई ), ह.भ.प. मनोहर महाराज सायखेडे (नाशिक) ह. भ. प. रोहिणी ताई परांजपे( पुणे), ह.भ.प. अनंत मोरे (मौदे ) या सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. तर ह.भ.प. लहू महाराज कदम (आखवणे ),ह.भ. प. रमेश महाराज मोरे (खेड ), ह भ प भास्कर महाराज बागवे( मुंबई ) यांची प्रवचन होणार आहेत. रविवारी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२. ३0 वा. काल्याचे किर्तन होईल. दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी पाच वाजता भव्य दिंडी सोहळा निघणार आहे. १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व सायंकाळी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री धाकुबाई देवी प्रा वारकरी सांप्रदाय भजन मंडळ मुंबई आणि आखवणे ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष मानाजी घाग, सचिव शैलेंद्र पडवळ, खजिनदार विलास कोलते यांनी केले आहे.