कणकवली तहसिलदार कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब योजनेतून 38 लाभार्थ्यांना होणार लाभ

कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या विशेष मोहिमेला आले यश; योजनेचा माध्यमातून 7 लाख 60 हजार रुपयांचा होणार लाभ

कणकवली (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात या मत्स्य व बंदरे विकास मंत्री व पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेनुसार आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी कार्यालयाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमध्ये विशेष मोहीम ग्राम स्तरावर राबविली. या योजनेच्या लाभापासून वंचित असलेले 38 लाभार्थी महसूल यंत्रणेमार्फत शोधण्यात आले. त्यांना 7लाख 60 हजार एवढा लाभ देण्यात येणार आहे. तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या कर्तव्यदक्षपणाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही राज्य शासनाची काहीशी दुर्लक्षित योजना आहे. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली नैसर्गिक मृत्यू झाल्यास शासनातर्फे २० हजार इतके आर्थिक सहाय्य शासनामार्फत देण्यात येत आहे. यासाठी मयत व्यक्ती १८ ते ५९ वयातील असणे आवश्यक आहे. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील असायला हवी अशी अट आहे. आतापर्यंत ज्यांना ही योजना माहीत आहे, त्यांनी अर्ज केल्यावर या योजनेत लाभ दिला जात होता, परंतु कणकवली तहसील कार्यालय मार्फत फेब्रुवारी 2025 या महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सर्व तलाठी यांनी ग्रामपंचायत रेकॉर्ड तपासून मागील तीन वर्षात १८ ते ५९ या वयातील मयत झालेल्या व दारिद्य रेषेखाली असलेल्या व्यक्तींची यादी तयार केली. कणकवली तालुक्यात केलेल्या सर्वेनुसार ३८ नवे लाभार्थी शोधण्यात आले. या प्रत्येकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रे व अर्ज भरून घेण्यात आली आहेत.
त्यामुळे शासनाकडून या ३८ लाभार्थ्यांना ७ लाख ६० हजार इतका लाभ देण्यात येणार आहे.

या सर्व जणांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहीत नसल्याने हे सर्व लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते. तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेतील नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून दिलीप पाटील, हेमा तोरस्कर, अनिता बागवे व सर्व तलाठी यांनी विशेष मोहीम घेऊन स्वतःहून या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यामुळे या लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या माध्यमातून राबवलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!