विद्यार्थी शिक्षक व पालक अशा त्रिसूत्री संकल्पनेतूनच विद्यार्थ्यांचा विकास साधू शकतो – जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थी-शिक्षक व पालक अशा त्रिसूत्री संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा आपण विकास साधू शकतो, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षणात अग्रेसर असणे गरजेचे आहे, असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. बदलती शैक्षणिक धोरणे व शैक्षणिक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढावा जेणेकरून शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होऊन वैभववाडी पंचक्रोशीतील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन अनेक सरकारी कार्यालयात अधिकारी व्हावेत या उद्देशाने या शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित केले होते.

यावेळी बोलताना रावराणे पुढे म्हणाले, विद्यार्थी व शिक्षक यांच्या बरोबर पालकांनी देखील दिवसभरात थोडा वेळ आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत त्याच्याशी चर्चा करण्यासाठी द्यावा, त्यांच्याशी दैनंदिन अभ्यासाबाबत संवाद साधावा. तरच आपली मुले यशस्वी होऊ शकतील असे त्यांनी सांगितले. शरद नारकर यांनी देखील उपस्थित पालक वर्गाला मार्गदर्शन केले.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक विजय रावराणे, शांताराम देसाई, वैभववाडी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता एकंदरीत मोठ्या संख्येने पालकांच्या उपस्थितीत हा शैक्षणिक परिसंवाद संपन्न झाला.

error: Content is protected !!