वैभववाडी (प्रतिनिधी) : मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संदेश सुरेश जाधव वय 35 राहणार सांगुळवाडी बौद्धवाडी असे या तरुणाचे नाव आहे ही घटना दुपारी साडेबारा वाजता सांगळवाडी येथील सुख नदीतील सिकंद कोंड येथे घडली आहे.
मयत संदेश जाधव हा सकाळी ११. ३० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावून घरी आला. घरी आल्यावर त्याचा मेहुणा सुनील दशरथ कांबळे याला आपण मासे मारण्यासाठी जाऊया असे सांगितले. मेव्हणे कांबळे यांचा फोन आल्यामुळे ते मागे थांबले. तोपर्यंत तो पुढे गेला. थोड्यावेळाने ठरलेल्या ठिकाणी सिकंड कोंड येथे मेहुणा गेला परंतु त्याला संदेश कुठे दिसेना, त्यांनी आजूबाजूला पाहिले, आवाज देऊनही त्याच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कांबळे परत घरी येऊन ही हकीकत सांगितली. त्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता, तो खोल पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होता. त्याला तातडीने पाण्याबाहेर काढून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
मयत संदेश हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले लहान मुले आहेत.












