मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी आयुक्तांकडे मागणी
पुणे (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कृषी आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी मा. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.
कंपन्यांच्या दरावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ३०० कोटी रूपयाची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते , किटकनाशके , पीजीआर व बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पध्दतीने करण्यात यावा याबाबत माहिती न दिल्याने नुकसान झाले आहे.
आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केलेली आहे. सदर कंपन्याच्या औषधांच्या किमतीमध्ये तफावत असून शेतकऱ्यांनी रोखीने औषध खरेदी केल्यास मुळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्याच्या औषधांची तपासणी करण्यात येते यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे.
यावेळी बोलताना मा आमदार बाळा माने म्हणाले कि आंबा पिकांच्या किड रोगांच्या औषध फवारणी मध्ये संशोधन विभागाने नेमक काय संशोधन केले तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत त्यांच्यावर गुणनियंत्रण विभाग यांनी काय कारवाई केली. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळ बाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नाही.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले, औषध विक्रेते हे शेतकऱ्यांच्या जीवावरती कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करतात. पण आता ज्या वेळी शेतकरी संकटात आहे त्यावेळी या औषध विक्रेत्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची दुसरी बाजू सहन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आता बाजारात अनेक बोगस विक्रेते औषधे विकत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. बोगस विक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन प्रत्येक विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी करून कीटकनाशकांचे स्टॉक रजिस्टर बघणे गरजेचे आहे. अशी भूमिका कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी मांडली.
यावेळी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, संचालक गुण नियंत्रक सुनिल बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर , गणेश गांवकर, प्रशांत शिंदे , प्रकाश बालवडकर, अजय तेली ,उमेश वाळके ,तिमीर माणगांवकर , सुजीत चौकेकर, दिपक कदम , विनय पाडावे , औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.











