कट्टा येथे कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न

कट्टा येथे सेवास्पर्श फाउंडेशन व रोटरी क्लब माहीम मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम

चौके (प्रतिनिधी) : आजच्या सोशल मीडियाच्या काळात सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणारी युवा पिढी सेवास्पर्श फाउंडेशन मध्ये दिसून आली. सामाजिक क्षेत्रात अशी युवा पिढी काम करण्यासाठी पुढे यावी ही कौतुकास्पद बाब आहे. कोणतेही सामाजिक कार्य म्हणजे देवकार्य समजले जाते. त्यामुळे आजचा होत असलेला कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी शिबिर हा कार्यक्रम म्हणजे देवकार्यच आहे. या देवकार्याला रोटरी क्लब मुंबई माहीम येथून सहकार्य लाभले त्याच्या देखील कार्याला सलाम आहे. कॅन्सर हा रोग भितीमुळे जास्त होतो पण त्यावर आता अनेक उपचार झाले आहेत. त्यामुळे त्यावर सहज मात करता येते. सेवास्पर्श फाउंडेशनचे हे मोठे कार्य आहे. तळागाळात जाऊन आपण गोरगरीब लोकांसाठी काम करताय. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार दैनिक तरुण भारतचे रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख पत्रकार शेखर सामंत यांनी कट्टा येथे कार्यक्रमात बोलताना काढले.

निरामय आरोग्यासाठी एक महत्त्वाच पाऊल हे ब्रीदवाक्य घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित सेवाभावी सामाजिक संस्था सेवास्पर्श फाउंडेशन व रोटरी क्लब मुंबई – माहीम ३१४१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामीण रुग्णालय पेंडुर – कट्टा व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग, RSSDI मुंबई यांच्या सहकार्याने पूर्णपणे मोफत कॅन्सर जनजागृती व मोफत तपासणी महाशिबिराचे आयोजन मालवण तालुक्यातील कट्टा येथे ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार शेखर सामंत उपस्थित होते. यावेळी मुंबई येथील नामांकित टाटा हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून कॅन्सर या आजाराबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय पेंडूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पोळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचा फीत कापून व दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सेवास्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, उद्योजक बीजेंद्र गावडे, उद्योजक आपा भिसे, उद्योजक देवेन (पपू) ढोलम, वराड ग्रामपंचायत सरपंच शलाका रावले, सेवास्पर्श फाउंडेशनचे उपाध्यक्ष शेखर मसुरकर, सचिव जयेद्रथ परब , ईश प्रेमालय सावंतवाडी कोलगावच्या सिस्टर श्रीमती निर्मला, सिस्टर झिना, लाइफ टाईम हॉस्पिटलचे डॉ. विनायक कांबळे, रोटरी क्लब मुंबई माहिमच्या सदस्य सौ. रश्मी पाटील, माझे आजोळ वृद्धाश्रमचे संस्थापक भरत भोगटे, डॉ. रोहित डगरे, डेरवनचे कॅन्सर स्पेशालिस्ट सचिन धुमाळे, तिरवडे ग्रामपंचायत सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, वराड ग्रामपंचायत सदस्य वर्षा मिठबावकर, पायल चव्हाण, प्राप्ती मिठबावकर, गणेश वाईरकर, सुमित सावंत, प्रवीण मिठबावकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, सागर चव्हाण, सतीश वाईरकर, मकरंद सावंत, सागर माळवदे, योगेश कामतेकर व सेवास्पर्श फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

ईश प्रेमालयचे कार्य म्हणजे देवकार्य
यावेळी पुढे बोलताना पत्रकार शेखर सामंत म्हणाले की सेवा म्हणजे काय तर सेवा म्हणजे पूजा. सेवेला पूजेचा दर्जा आहे. तो दर्जा आजच्या कार्यक्रमाला निश्चितच मिळेल. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित असलेल्या ईश प्रेमालय संस्थेचे विशेष आभार मानावे लागतील कारण कॅन्सर सारख्या आजाराने चे रुग्ण त्रस्त आहेत. ज्यांना पुढच्या क्षणी कोणीच आधार देत नाही अशा व्यक्तींना ईश प्रेमालय संस्था आधार देते व त्यांचा सांभाळ करते खरोखरच त्यांचे हे कार्य म्हणजे देवकार्य म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. तसेच रोटरी क्लब मुंबई माहिम येथून अशा सामाजिक संस्थाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे. ह्या त्यांच्या कार्याला सलाम आहे विशेष करून रोटरी क्लबच्या सदस्य सौ रश्मी पाटील मॅडम यांचे व रोटरी क्लबचे विशेष आभार मानावे लागतील कारण ह्या कार्यक्रमाला त्या स्वतः उपस्थित राहून सहकार्य करताना दिसून येत आहेत. आम्ही दै. तरुण भारत संवादच्या माध्यमातून देखील आमच्या परीने असेच सहकार्य करत आहोत. अशा कार्याला माझा नेहमी हातभार असेल. असे सांगीतले.

रोटरी क्लब मुंबई माहिमच्या सदस्य सौ रश्मी पाटील बोलताना म्हणाल्या की सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवड लागते त्याचसोबत नशिबही लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवकार्य करणारी संस्था म्हणजे ईश प्रेमालय आहे. परंतु त्याठिकाणी जाण्याची वेळ कुणावर शक्यतो येऊ नये व कॅन्सर आजारावर निदान होऊन आपण लवकर बरे व्हाल यासाठी हा कार्यक्रम रोटरी क्लब मुंबई माहिम व सेवास्पर्श फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आला. यापुढे देखील असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. तसेच अशा सामाजिक कार्यक्रमाला रोटरी क्लब मुंबई माहिम यांचे नेहमीच सहकार्य राहील असे सांगत आमचा ईश प्रेमालय संस्थेसाठी नेहमी खारीचा वाटा असेल असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमादरम्यान लार्मिका मिथिला निलेश तवटे राहणार कसाल ह्या पाच वर्षाच्या मुलीने शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या उत्तुंग भरारीची व यशाची दखल घेत सेवास्पर्श फाउंडेशनच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी लाड व ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.

error: Content is protected !!