वैभववाडी (प्रतिनिधी) : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत १२५ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात (NTEP) उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉक्टर्स फ्रटरनिटी क्लब, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांचा क्षयरोग निर्मुलनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. संजय केसरे (अध्यक्ष, IMA), डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. जी. टी. राणे तसेच केमिस्ट असोसिएशनचे आनंद रासम यांचाही गौरव करण्यात आला.क्षयरोग निर्मूलनासाठी शासकीय यंत्रणेसोबत खाजगी वैद्यकीय क्षेत्रानेही सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात डॉ. राजेंद्र पाताडे यांचे सहकार्य व योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयीन कर्मचारी रमेश परब, नितीन नाईक, गणेश जाधव, अनिरुद्ध चव्हाण, सुरेश मोरजकर, सिद्धेश राणे डॉ. दीपा देशपांडे , स्वप्नील तारी आदी उपस्थित होते.
क्षयरुग्णांना पोषण आहारासोबत मानसिक आधार देत, समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवून सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या अभियानाला अधिक बळ देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हा लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.












