ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार – देवेंद्र फडणवीस

(ब्युरो न्यूज ) : राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबवण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, राज्यासह देशभरात सर्वपरिचित असलेली पंतप्रधान मोदी घरकुल योजना अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. त्याचबरोबर राज्यातील ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर, शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे तब्बल वर्षभरानंतर नगरला आल्याचे सांगण्यात येत आहे. आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

दरम्यान यावेळी फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळमुक्त तलाव’ योजनेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत नगर जिल्ह्याचे उत्तम काम असल्याचे सांगत आगामी काळात ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री सौर्यपंप योजनेचे सुरुवात राळेगणसिद्धीतून केली होती, आता हीच योजना राज्यभर नेणार आहोत. सौर पंप योजनेच्या 800 फीडरसाठी जागा शोधण्याचे काम सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी 291 कोटी अनुदान मंजूर असून त्यातील 161 कोटी अनुदानाचे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!