खड्डे भरणे, गटार सफाईची कामे दोन दिवसात सुरू करणार : उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांची कबुली
वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाचा पैसा हा जनतेसाठी वापरा. आम्ही तुमच्या खिशातले पैसे मागत नाही आहोत. चुकीचे पाऊल आम्हाला उचलायला भाग पाडू नका. असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी अधिका-यांना सुनावत धारेवर धरले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच करूळ घाटाची दुर्दशा होत आहे. असा आरोपही त्यांनी केला. घाटातील गटारेे साफ करून खड्डे तात्काळ भरा. कारणे कोणाचीही ऐकून घेणार नाही. असे राणे यांनी महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता श्री अतुल शिवनिवार यांना सांगितले. संबंधित अधिकारी यांना खडे बोल सुनावताच गटर व खड्डे भरण्याचे काम त्वरित सुरू केले जाईल व घाटात जेसीबी कायमस्वरूपी उपलब्ध केला जाईल असे अधिकारी शिवनिवार यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार नितेश राणे यांनी करूळ घाटाची पाहणी केली. एडगाव, करूळ व गगनबावडा हा मार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या मार्गे प्रवास करणे देखील अवघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी पाहणी दौरा केला.
ईरशाळवाडी सारखी घटना घडू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. या घाट मार्गाला 250 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याची प्रोसिजर अजूनही सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने हा मोठा निधी प्राप्त झाला आहे. या कामाची प्रोसिजर सुरू असली तरी सद्यस्थितीत संबंधित विभागाने या मार्गाची तात्काळ डागडुजी करावी. अशा सुचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जीएसबी मटेरियलने खड्डे भरा. स्थानिक ठेकेदारांना विश्वासात घेऊन गटर व खड्डे भरण्याचे काम करा. असे त्यांनी सांगितले. जीएसबी मटेरियलने खड्डे भरले जातील. गटारे साफ केली जातील. त्याचबरोबर घाटात कायमस्वरूपी जेसीबी उपलब्ध केला जाईल असे शिवनीवर यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, इरशाळवाडी सारखी घटना येथे घडवू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. एडगावपासून करुळ घाटापर्यंत खड्डे खूप आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात हा मार्ग निर्धोक होईल. भुईबावडा घाटाप्रमाणे हा देखील मार्ग केला जाईल. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे काम आपल्याला सर्वांना माहीत आहे. जिल्ह्यातील विकास कामांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील लक्ष ठेवून आहेत. मागिल अधिवेशनात पालकमंत्री चव्हाण यांनी या घाटासाठी निधीची घोषणा केली आहे. लवकरच घाटाच ग्रहण कायमस्वरूपी सुटेल असे ठाम पणे नितेश राणे यांनी सांगितले.











