भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या कोकण विभाग संपर्कप्रमुख पदी डॉक्टर गणेश उर्फ भाई बांदकर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग – देवगड मधुन डॉ. गणेश उर्फ भाई रामचंद्र बांदकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी किसान मोर्चा- संपर्क प्रमुख म्हणुन ठाणे व कोकण ( रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ) विभागासाठी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर हे लहानपणापासुन संघ स्वयंसेवक त्यामुळे जनसंघ – जनता पार्टी – भारतीय जनता पार्टी असा राजकीय प्रवास करत आलेले व्यक्तीमत्व आहे.मागील पस्तीस वर्षे पुण्यात विविध व्यक्तीमत्वाच्या प्रचारयंत्रणेची यशस्वीपणे धुरा सांभाळून त्यांना यश संपादन केले आहे. ते यशदा पुणे येथे कार्यरत असल्यामुळे पक्षाच्या कोणत्याही पदावर नसतानाही एक संघ स्वयंसेवक या नात्याने ते कार्यरत होते. आजही ते माहिती अधिकार अधिनियम २००५ चे प्रशिक्षक आहेत व त्याचे प्रशिक्षण ते महाराष्ट्र भर नागरीक व कॉलेज तरुणांसाठी देत आहेत.

डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर यांनी हस्ताक्षर सुधारणा विषयातील भारतातील पहिली डॉक्टरेट मिळविली आहे. त्या माध्यमातुन ते महाराष्ट्रभर हस्ताक्षर सुधारणा सेमीनार घेत आहेत.देवगड सिंधुदुर्ग हे त्यांचे मुळ गांव असल्यामुळे मागील वर्षापासून ते देवगडमध्ये स्थायीक झाले आहेत व यावर्षी त्यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधुन शेतकरी मुर्ती कलाकारांकडुन गोमय गणपती बनवुन घेवुन ते मुंबई – पुणे शहरात पाठविले आहेत.

रिव्हर्स मायग्रेशन थ्रू अँग्री प्रोजेक्ट म्हणजे शहरात टीचभर पगाराच्या नोकरीसाठी गेलेल्या कोकणातील तरुणांनी अॅडव्हान्स ॲग्रीकल्चर, अॅग्रो टुरीझम, गोपालन, अटल गोठा फॅक्टरी अशा स्वतःचे व्यवसाया करण्यासाठी परत आपल्या मुळ गावी यावे या डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर यांनी स्वतः केलेल्या प्रोजेक्टवर ते किसान मोर्चाच्या माध्यमातुन कार्यरत रहाणार आहेत.

लहानपणापासुन स्व. आप्पासाहेब गोगटे यांचा आदर्श त्यानी कार्यात ठेवला आहे व यापुढे ते दिलेल्या चार जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत रहाणार आहे.

आपल्या हातुन शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्यांच्या समस्या सुटण्याकरीता योग्य ते प्रयत्न होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.आपण पूर्णवेळ भाजपा किसान मोर्चाकरीता झटून काम करावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले आहे.

भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीत संपर्क प्रमुखपदी निवडीचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे,रविंद्र अमृतकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी यांना त्यांनी दिले आहे.

error: Content is protected !!