छत्रपतींचा पुतळा बसविण्याचे काम पिडब्ल्यूडी चे नाही तर नेव्ही चे
पिडब्ल्यूडी कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर, शिवप्रेमीं जनतेकडे दिलगिरी केली व्यक्त
मालवण (प्रतिनिधी): ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेना दिवसाप्रित्यर्थ राजकोट किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मा. पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमानंतर राजकोट येथील तटबंदीचे दगड खाली पडले असल्याचे व पुतळ्याच्या चौथऱ्याचे ग्रेनाईट अर्धवट अवस्थेत व तुटले असल्याचे फोटो बऱ्याच सोशल मिडिया साईटवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाची नाहक बदनामी होत आहे. वास्तविकतः पुतळा व त्याच्या चौथऱ्याचे काम संपूर्णपणे नौसेना दलामार्फत करण्यात आलेले आहे. किल्याचा दरवाजा व तटबंदीचे काम सा. बां. विभागामार्फत करणेत आले आहे. पुतळ्याचे अनावरण प्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापकामार्फत तात्पुरते स्वरूपाचे भव्य लोखंडी स्टेज उभारण्यात आले होते. त्यावेळी लोकांना उभे राहण्यासाठी बनविलेल्या प्लेटफोर्म मुळे तटबंदीवरील काही उभे दगड काढून ठेवण्यात आले होते, सदरचे दगड पडले नाहीत. सदरचे काढून ठेवणेत आलेले दगड आता बसविण्यात आले आहेत. किल्ला व तटबंदीचे कोणतेच काम निकृष्ट झालेले नाही. तसेच अनावरणप्रसंगी चौथ-यऱ्याच्या चारी बाजूने अवजड लोखंडी कॉलमवर पडदे बसविण्यात आले होते. अवजड लोखंडी कॉलम ग्रेनाईटवर ग्रीप न मिळता घसरतील यामुळे ग्रेनाईट बसविण्यात आले नव्हते. आता ग्रेनाईट बसविण्याचे काम सुरु असून उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करणेत येईल. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसराचे पावित्र्य राखणेच्या कर्तव्यात कोणतोच तडजोड या विभागामार्फत केली गेलो नाही. तरीही शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांची मने दुखावल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. या परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपली मते, मौलिक सूचना, अभिनव कल्पना अथवा विचार खालील पत्त्यावर सा. बां. विभागास कळवावे. त्यावर उचित कार्यवाही करणेची नोंद घेणेत येईल.असे सार्वजनिक बाांधकाम उपविभाग, मालवण यांच्या वतीने सांगण्यात आले.