रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावर असणार फोकस
दोडामार्ग मध्ये 1 हजार एकरवर 500 कारखाने आणणार
केंद्रीयमंत्री राणेंनी कणकवली शहरातील महायुती कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कणकवली (प्रतिनिधी) : माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये 1 हजार एकरवर 500 कारखाने आणण्याचा माझा मानस आहे.शुभकार्याला जाताना जसे देवाच्या पाया पडतो तसाच आता लोकसभेला सामोरे जायचंय तर आधी कणकवली शहराला सामोरा जातोय अशी भावनिक साद केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात घातली. पुढे बोलताना मंत्री राणे म्हणाले की, कणकवली शहरातील 90 टक्के मतदान महायुती ला हवे आहे. कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आणि व्यापाराचे केंद्र आहे. विनायक राऊत भाजपाच्या जीवावर खासदार झाले. स्व. बाळासाहेबांनी कायम काँग्रेस ला विरोध केला. आज उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा केला. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा चा एकही खासदार निवडून येणार नाही. विरोधकांकडे नेतृत्व शिल्लक नाही. भाजपाचे 370 आणि एनडीए चे मिळून चारसौ पार हा पंतप्रधान मोदी यांचा नारा आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. 2014 साली जागतिक अर्थव्यवस्थेत 14 व्या क्रमांकावर असलेला भारत मोदी यांनी जगात 5 व्या क्रमांकावर आणला आहे. येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मोदी करणार आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने विशेष उपक्रम राबवले. मोदींनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू ठेवले आहे. खासदार म्हणून विनायक राऊत ने मागील 10 वर्षांत काय आणले ? विकासकामांत अपयशी ठरलेल्या विनायक राऊत ला घरी बसवण्याची वेळ आता आली आहे. विनायक राऊत स्वतःच्या तळगाव गावातील घराकडे जाणारा रस्ता माझ्या विकास निधीतून केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत कोकणासाठी काय दिले ? रोजगार, आरोग्य दळणवळण सिंचन साठी काय केले ? कोकणी माणसामुळे शिवसेना फोफावली. पण त्याच कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. दोडामार्ग मध्ये 1 हजार एकरवर 500 कारखाने आणणार आहे. ओरोस येथे टेक्निकल सेंटर सुरू केले आहे. फ्रुट प्रोसेसिंग मशीन आणि इंजिनिअरिंग चे प्रशिक्षण तेथे देण्यात येणार आहे. ट्रेनिंग घेतलेल्या मुलांना देशात परदेशात नोकरी मिळेल. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.













