कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, कोकण बोर्ड होणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि. ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनि.काॅलेज कनेडी ता. कणकवली केंद्रावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रसंचालक बयाजी बुराण यांनी दिली. या परीक्षेसाठी एकूण २०८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी ११ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.
सदर केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केंद्र क्रमांक ८६४ कनेडी येथे कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांची बैठक क्रमांक W008467 ते W024188 अशी करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, उपकेंद्र संचालक म्हणून प्रकाश बागुल काम पाहत आहेत ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते दि.११ मार्चपर्यंत होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त राहणेसाठी कोकण विभागाने भरारी पथके नेमली आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथकेदेखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. अकरा वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. १०.४० वाजता उत्तरपत्रिका आणि ११.०० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. अकरा वाजताच लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ताणतणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन केले आहे..
👉विद्यार्थ्यांना लिखाणासाठी १० मिनिटे ज्यादा वेळ.
बोर्डाने विद्यार्थ्यांना १० मिनिटे वेळ वाढवून दिला असून सकाळ सत्रातील पेपर ११:०० ते २:१० पर्यंत असेल तर दुपारचा पेपर ३:०० ते ६:१० पर्यंत असेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची ही परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी मंडळाने नियमावलीत काही बदल केले आहे. त्यानुसार यंदाची परीक्षा पार पडणार आहे.