उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून सेन्सर एलईडी स्ट्रीट लाईट शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : वीज बचत म्हणजेच वीजनिर्मिती आहे. वीजपुरवठ्याच्या वाढत्या मागणीमुळे अनावश्यक विजेचाही वापर नकळत होतो. हाच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी वारगाव गावात सेन्सर एलईडी बल्ब स्ट्रीट लाईट साठी वापरत असल्याचे वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांनी सांगितले. उपसरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून वारगाव गावातील स्ट्रीट लाईट साठी सेन्सर एलईडी बल्ब च्या वापराचा शुभारंभ ग्रामपंचायत मध्ये करण्यात आला. यावेळी शेट्ये बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद केसरकर, सुभाष घावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजा जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी विलास मांजरेकर, विलास तळेकर, प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत काणकेकर आदी उपस्थित होते. एलईडी सेन्सर मोशन बल्ब च्या १५ फूट परिघात हालचाल झाल्यास बल्ब आपोआप प्रज्वलित होतात. हा उजेड पुढील २ मिनिटे राहतो आणि नंतर बल्ब बंद होतात. यामुळे अनाठायी रात्रभर स्ट्रीट लाईट वरील बल्ब पेटत राहिल्यामुळे विजेचा होणारा अपव्यय टळणार आहे. त्यासोबतच वीज बिलात सुद्धा कपात होणार आहे. साहजिकच त्यामुळे ग्रामपंचायत खर्च कमी होईल. ग्रामपंचायत चे मिळणारे उत्पन्न गावच्या अन्य अत्यावश्यक विकासकामांसाठी अथवा ग्रामस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल.














