शिक्षणासाठी ए.आय.तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा – नामदार नितेश राणे
कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई च्या शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे नुकताच साजरा करण्यात आला. येत्या ७० वर्षाच्या कालावधीत कनेडी गट शिक्षण संस्थेने उल्लेखनीय व दर्जेदार शिक्षणाचे अमुलाग्र कार्य केले आहे. या ७१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नामदार नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या, शिक्षणामध्ये कधीही राजकारण न करता समाजकारण होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, “जिल्ह्याचा विकास हाच आमचा ध्यास” नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कौशल्य विकास आधारित ए.आय.तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जातील असेही मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षार्थी गुणवंत विद्यार्थी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेची स्थापना दिनांक ४ जुलै १९५४ रोजी कनेडी या ठिकाणी करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या शिक्षण संस्थेची स्थापना झाली.आज या शिक्षण संस्थेने जिल्हा व राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेत नावलौकिक मिळवला आहे. प्रशालेने मिळवलेले देदीप्यमान यश व यशाची परंपरा कायम राखली आहे, दरवर्षी प्रशालेचा निकाल शंभर टक्के असून शालेय परिसर, सुंदर व स्वच्छ वातावरणात आहे.भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.असे मत संस्थेचे खजिनदार प्रकाश सावंत यांनी व्यक्त केले.
गेल्या ७१ वर्षातील शिक्षण संस्थेची घोडदौड ही वाखाण्याजोगी आहे, या यशाचे खरे वाटेकरी हे सर्व शिक्षकांनी घेतलेली अपार मेहनत, हेच खरे यशाचे गमक आहे. प्रशालेची प्रगती व विकास दिवसेंदिवस होत राहील त्यासाठी नितेश राणे नेहमीच कटिबद्ध आहेत. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने २५ लाखाचा निधी ज्ञानदीप सांस्कृतिक भवन दुरुस्तीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत या प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत साहेब होते. ७१ व्या वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या स्थापने पासून ते जडणघडणीत राणे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक शिक्षण संस्थांची चांगल्या प्रकारे शैक्षणिक प्रगती व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती नामदार नितेश राणे (मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग), सतीश सावंत (अध्यक्ष, क.ग.शि.प्र.मंडळ), पी.डी सावंत (उपाध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ),शिवाजी सावंत (क.ग.शि.प्र.मंडळ, सरचिटणीस), प्रकाश सावंत ( खजिनदार,क.ग. शि.प्र. मंडळ), संदेश सावंत (माजी अध्यक्ष, जि.प.सिंधुदुर्ग व संचालक क.ग.शि.प्र मंडळ), व्ही. बी.सावंत (संचालक, क.ग. शि.प्र.मंडळ) आर.एच. सावंत (शालेय समिती, चेअरमन) आदी मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थिती ७१ दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उपस्थिती साठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व शालेय समितीचे सर्व सदस्य, युवा संदेश प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते, दशक्रोशीतील जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, हितचिंतक, पत्रकार बंधू,माजी विद्यार्थी व पालक आणि प्रशालेतील मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सावंत, संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर तर आभार पी.डी.सावंत यांनी केले.













