दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज देशभरातील हजारों भाविक कोल्हापुरात येत असतात. दर्शनानंतर या भाविकांना श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे गेल्या आठ वर्षांपासून दररोज अन्नछत्राच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप केलं जातं. यापूर्वी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत महाप्रसादाचं वाटप केलं जात होतं. मात्र, जिल्हयात विविध ठिकाणच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. त्यामुळं आज दिवसभर या महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून आज या सेवेचा शुभारंभ क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेश्वरी सरनोबत यांनी सव्वा लाख रूपयांचं भांडी साहित्य श्री अंबाबाई अन्नछत्रचे अध्यक्ष संजय साळोखे यांच्याकडं सुपुर्द केलं. या नवीन भांड्यांचं पूजनही करण्यात आलं. दरम्यान, या अन्नछत्राचा भाविकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन अन्नछत्रचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी केलं.
यावेळी कार्याध्यक्ष नंदू घोरपडे, शिला माने, विकास जाधव, सुनीता भोसले, निकिता मोरे, रेखा साळोखे, सुधीर नेर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.











