तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा अकरावा वर्धापन दिन ११ ते १४ जुलै २०२५ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कालावधीत बुद्धिमत्ता चाचणी, वक्तृत्व व सांस्कृतिक स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘गार्गी डे’ बुद्धिमत्ता चाचणीत प्रथम क्रमांक यामिनी मेस्त्री (प्रथम वर्ष, बीबीआय) हिला, तर ‘चाणक्य डे’ मध्ये प्रथम क्रमांक सागर खरात (प्रथम वर्ष, बीएससी आयटी) याला प्राप्त झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सहाय्यक प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे मानद मार्गदर्शक विनायक दळवी यांचे महाविद्यालयाच्या उभारणीत व प्रगतीतले योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, “दळवी सरांच्या दूरदृष्टीमुळेच हे महाविद्यालय आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनले आहे. हा वर्धापन दिन त्या यशाचा साक्षी आहे.”
कार्यक्रमानंतर विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करून सर्व विजेत्यांना प्राध्यापकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले कला, वक्तृत्व व नेतृत्व कौशल्य प्रभावीपणे सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयुष सुतार आणि हर्ष वायंगणकर यांनी, तर आभारप्रदर्शन दिया कांबळे हिने केले. कार्यक्रमाचे नियोजन सहा. प्रा. अलका गवळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.











