खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय गोविंदा स्पर्धा पर्व -२ रे यांच्या वतीने दि.१० ऑगस्ट, २०२५ रोजी मुंबई अंधेरी येथे दहीहंडी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत कोकणातील राजापूर तालुक्यातील महिला गोविंदा पथकाने उंच मानवी थर रचत कोकणाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला. त्यांच्या या चित्तथरारक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या संपूर्ण स्पर्धेत एकूण ८ महिला गोविंदा संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर यांनी प्रथम फेरीत योग्य वेळ घेऊन नियोजनबद्ध ५ थर रचून दुसऱ्या फेरीत स्थान निर्माण करून उत्कृष्टरित्या ६ थर मानवी मनोरा रचून कोकणच नाव संपूर्ण स्पर्धेत उंचावत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वविक्रमी स्पॅनिश कॅस्टेलर्स हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवशक्ती महिला पथकाला सन्मानित करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व गोपिका, प्रशिक्षक/संयोजक प्रतिक अशोक गुरव आणि सर्व सदस्य यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.












