कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील अवैध जुगार बंद करण्यासाठी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी परवा एक धाड टाकली. पण अद्याप अनेक दारू, जुगार, रेती, जंगल तोड असे अवैध धंदे देवगड, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी येथे चालू आहेत. बहुतांशी हे धंदे करणारे, आपल्याला राज आश्रय मिळावा, म्हणून कुठल्या पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहेत, हे सांगणे म्हणजे हाताच्या कंगव्याला आरसा दाखविण्यासारखे होईल. पण, आता पालकमंत्री यांनी केलेली धाड कारवाई ही मटका (कल्याण/वरळी) बाजार पर्यंत जाणार नसेल तर तो एक फार्स होणार आहे. हे माजी पोलिस अधिकारी म्हणून मला वाटत आहे.
सिंधुदुर्गात अनेक अधिकृत बार हे राजकीय कार्यकर्ते यांचे आहेत. पण, त्यात स्वस्त गोवा दारू सर्रास दिली जात आहे. त्यावर एक्साईज वा जीएसटी विभागाचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. हे सुद्धा जिल्हा प्रशासन यांनी लक्ष घालून पाहिले पाहिजे. कारण पालकमंत्री ह्यांच्या साठी ते, “ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी” असे असल्याने आता त्यांना अवघड जागी दुखणे होणार आहे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपल्या बॉस ला ह्या जिल्ह्यात उद्योग धंदे निर्मिती साठी लक्ष घालायला सांगितले तर ते जास्त चांगले होईल.










