आचिर्णे बौद्ध विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात संपन्न
संयुक्त जयंती उत्सवातून महामानवांच्या कार्याला अभिवादन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महामानवांच्या जयंत्या साजरे करत असताना त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या मार्गावरून गेल्यास आपली प्रगती होऊ शकते. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले. आचिर्णे बौध्द विकास मंडळ मुंबई रजि. ग्रामीण या मंडळाचा सुवर्ण महोत्सव व भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुल, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानावाचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते. यावेळी सरपंच वासुदेव रावराणे, माजी सरपंच सुशीलकुमार रावराणे माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, सचिव रविंद्र पवार, शरद कांबळे, मंडळाचे अध्यक्ष सतीश कदम, महिला मंडळ अध्यक्ष अरुणा कदम, स्वागतध्यक्ष दिगंबर कदम, अनंत कदम, सुधाकर कदम, सतीश तानवडे, विकास मुणगेकर, धर्मेंद्र कदम,सागर कदम आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सुरुवातीला सकाळी बुद्ध पूजा पाठ, दुपारी महिला व मुलांसाठी विविध फनी गेम्स घेण्यात आले. तर चवदार नळ योजनेचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती सिद्देश रावराणे उपस्थित होते. रात्री स्थानिक मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मंत्र केले. प्रमुख वक्ते रविराज कांबळे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण व स्त्रियांच्या उन्नतीसाठी असलेले योगदान यावर मार्गदर्शन केले तर सुरेश जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा तरुण वर्ग या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्ध दास कदम, सूत्रसंचालन अमर कदम यांनी तर आभार सार्थक कदम यांनी मानले.












