वटवृक्ष मंदिरातील धर्मसंकीर्तनात घुमला कुलकर्णींच्या गायनाचा स्वर
मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनात सोलापूरच्या विलास कुलकर्णी यांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कुलकर्णींच्या या स्वर गायनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या आठव्या पुष्पातील दुसरे सत्र भक्ती भावाने गुंफले गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी विलास कुलकर्णी व सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सन्मान केला. या कार्यक्रमात त्यांनी अभंगवाणी स्वर सादर केली. प्रथम तुला वंदितो, हरी बोले चिपळी संग, धाव पाव स्वामी समर्थ, भाग्यलक्ष्मी बारम्मा इत्यादी भावभक्ती गीते सादर करून उपस्थित भाविकांची वाहवा मिळवत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी जो सदा वही परमपद पायेगा या पंडित भीमसेन जोशींच्या भैरवीने सांगता केली. कार्यक्रमात त्यांना तबल्यावर नितीन दिवाकर, टाळवर अक्षय सरदेशमुख आदींसह अन्य कलाकारांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले तर आभार मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी यांनी मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, अमर पाटील, प्रसाद पाटील, संतोष फुटाणे-जाधव, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, विपुल जाधव, संतोष जमगे, मोहन जाधव, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, स्वामीनाथ लोणारी, मयूर स्वामी आदिसह अन्य स्वामीभक्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.












