सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा – सी. इ. ओ. रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छोत्सव या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

या पंधरवड्या दरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातुन देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या गावात सामूहिक श्रमदान करून स्वच्छता मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

१७ सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ होणार असून यात स्थानिक संस्था, विविध विभाग, कार्यालये, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन प्रभावी जनजागृती राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणजे केवळ मोहिम नसून हा सामूहिक कृतीचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागातूनच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ, निरोगी व सुजल बनविण्याचे ध्येय साध्य होईल असे खेबुडकर म्हणाले.

error: Content is protected !!