वैभववाडी (प्रतिनिधी) : पोलीस व गावातील ग्रामस्थ यांच्यातील पोलीस पाटील हा महत्वाचा दुवा आहे. गावातील कायदा व सुव्यस्था राखण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, शाखा वैभववाडी यांच्या वतीने आयोजित पोलीस पाटील दिन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सोनवलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार महेश रावराणे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रावराणे, उद्योजक रामदास नागप, संघटनेच्या उपाध्यक्ष समिधा सावंत आदी उपस्थित होते.
सोनवलकर पुढे म्हणाले ग्रामीण भागातील सामाजिक स्थैर्य टिकवण्यासाठी पोलीस पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. यापुढेही त्यांनी असेच प्रामाणिकपणे काम करून प्रशासनाला वेळोवेळी मदत करावी. यावेळी अवधूत तळेकर यांनी पोलीस पाटील संघटनेच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेतला व पोलीस पाटील संघटनेचे एकजूट असल्याने त्यांना शासन दरबारी न्याय मिळाल्याचे सांगितले. यावेळी वैभववाडी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.










