आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने सन २०२३ मध्ये १८ ललित लेखकांच्या सहाय्याने ‘बीज अंकुरे अंकुरे ‘हे पुस्तक प्रकाशित केले. सदर पुस्तक सुरेश शामराव ठाकूर गुरुजी अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी संपादित केले. त्याला अलिकडेच केंद्रीय कोमसापचा आदर्श संपादित ललित पुस्तकाचा वाङमयीन पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्ताने कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांचा गौरव सोहळा कोमसाप मालवणच्या आचरे येथील कार्यालयात आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी सुरेश ठाकूर हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून रुजारिओ पिंटो (मालवणी कवी), सुनंदा कांबळे (ज्येष्ठ कवयित्री) हे उपस्थित होते.
यावेळी ‘बीज अंकुरे अंकुरे’ चे १८ ललित लेखक पूर्वा मनोज खाडिलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, शिवराज विठ्ठल सावंत, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक धोंडू कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरव करण्यात आला.
यावेळी कवी मंदार सांबारी यांनी ‘मालवण कोमसाप की जय’ हे स्फूर्तीगीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी पाठविलेल्या शुभेच्छा तेजल ताम्हणकर यांनी सभागृहात वाचून दाखवल्या. आत्माराम नाटेकर यांच्या गौरव पत्राचे अभिवाचन उज्ज्वला धानजी यांनी केले. यावेळी मंदार सांबारी आणि गिरीधर पुजारे यांना ‘गानकवी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेहा बापट आणि चंद्रकला दिवेकर यांना आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार तर द.शि. हिर्लेकर यांच्या आत्मचरित्राला गेल्या सहा महिन्यात सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने ‘षटकार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सुधाकर वळंजू यांना तज्ज्ञ परीक्षक आणि स्नेहा नारिंगणेकर यांना चोखंदळ वाचक पुरस्कार मालवण कोमसापतर्फे प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त सन्मानितांना मालवण कोमसापतर्फे सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि ग्रंथभेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
रुजारिओ पिंटो यांचा ‘राजधानी’ पुरस्काराबद्दल सत्कार
रुजारिओ पिंटो यांना नुकताच राजधानी पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कोमसाप मालवणच्या वतीने बाबाजी भिसळे, अध्यक्ष रामेश्वर वाचन मंदिर आचरा आणि अशोक कांबळी, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा या ज्येष्ठ कोमसाप कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचवेळी सुनंदा कांबळे यांनी त्यांना ओवाळून पिंटो यांच्यावर एक मालवणी गौरवगीत सादर केले. तर ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती’ हे ओवाळणीगीत सादर करून रश्मी आंगणे यांनी कार्यक्रमात रंग भरले. सत्काराला उत्तर देताना रुजारिओ पिंटो म्हणाले, मी कवी म्हणून पुढे येण्यासाठी मला कोमसापची साथ लाभली. मालवणच्या सर्व लेखक कवींनी कोकण मराठी साहित्य परिषदेचा लाभ घेऊन आपणही मोठे व्हावे. बीज अंकुरे अंकुरेच्या सर्व अठरा लेखकांचे मी कौतुक करतो आणि बीज अंकुरे अंकुरेची दुसरी आवृत्ती यावी, अशा शुभेच्छा देतो.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुरेश ठाकूर म्हणाले, कोमसाप ही संस्था नसून ही एक चळवळ आहे. या अक्षर दिंडीत जे जे सहभागी झाले आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार लाभले त्या सर्वांचे अध्यक्ष या नात्याने मी कौतुक करतो. सर्व कायकर्त्यांनी अशीच साहित्यसेवा करून कोमसाप मालवणचा ध्वज मराठी साहित्य विश्वात सदैव फडकत ठेवावा. संपादक सुरेश ठाकूर गुरुजी यांचा कोमसाप मालवणच्या वतीने रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुरेश गावकर, माधव गावकर, अंकुश वळंजू, सुधाकर वळंजू, प्रकाश पेडणेकर, कुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर अनिरुद्ध आचरेकर, पांडुरंग कोचरेकर, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, एकनाथ गायकवाड, सुरेंद्र सकपाळ, रमाकांत शेटये, अनघा कदम, विनोद कदम, महादेव बागडे, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे ,रावजी तावडे, वर्षा सांबारी, चंद्रशेखर धानजी, गोविंद प्रभू, श्रावणी प्रभू, त्रिंबक आजगावकर, शरयू हिर्लेकर या कोमसाप मालवणच्या सदस्यांसोबतच बहुसंख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.










