भुईबावडा ग्रामपंचायतीच्या वतीने एकल व्यक्तींचे स्विकारले दायित्व
घरपट्टी पाणीपट्टी माफ व जीवनावश्यक वस्तू, औषधे मोफत उपलब्ध करून देणार
वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत भुईबावडा ग्रामपंचायतीच्या वतीने एकल निराधार महिला व एकल निराधार पुरुष अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवासुविधा पुरविण्याचे दायित्व स्विकारले आहे. सरपंच बाजीराव अमृत मोरे व ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर यांच्या उपस्थितीत भुईबावडा ग्रामपंचायतची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये एकल महिलांना साड्या व एकल पुरुषांना ड्रेस वाटप करण्यात आले. शिवाय यापुढे त्यांना लागणारी वैद्यकीय सेवा, औषधे मोफत व लागणारे धान्य मोफत उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला. याखेरीज त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करुन त्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली. गावातील निराधार लोकांचे रहाणीमान उंचावण्यासाठी नेहमी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन देखील सरपंच बाजीराव मोरे यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी उपस्थित गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले , सरपंच बाजीराव मोरे, उपसरपंच स्वप्नाली देसाई, ग्रामपंचायत अधिकारी दीपक केतकर, सदस्य कल्याणी देसाई, श्रेया मोरे, मोहिनी कांबळे, वैशाली शिंदे, ग्रामस्थ श्रीधर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.












