कोल्हापूर घाट मार्गे जाणाऱ्या एसटी गाड्या बंद केल्या; विद्यार्थी-रुग्णांची गैरसोय
तातडीने एसटी पूर्ववत सुरू करावी आणि भविष्यात पर्यायी मार्गाने चालू ठेवावी अशी आग्रही मागणी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवगड-निपाणी राज्य मार्गावरील ब्रिटिशकालीन दोन ब्रिज, रस्ता रुंदीकरण आणि पुनर्बांधणीच्या शाश्वत विकासासाठी पाडण्यात येणार आहेत. फोंडाघाट ग्रामपंचायतला कुठलीही कल्पना न देता सदर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर सरपंच व सदस्यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला पत्र देऊन आपला निषेध नोंदवला. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन कामाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.
यावर दुसऱ्याच दिवशी ठेकेदार आणि डेप्युटी इंजिनियर प्रभू यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन अनधिकृत बैठक घेतली. मात्र ग्रामस्थ आणि सदस्यांच्या प्रश्नाच्या भडिमारापुढे दोघेही अनुत्तरीत झाले. अखेर पर्यायी मार्ग होईपर्यंत ब्रिज पाडू नयेत व हसणे-दाजीपूर पासून शाळेत येणारी विद्यार्थी-रुग्ण, बाजारपेठेत येणारे ग्रामस्थ यांची गैरसोय टाळावी, अशी संतप्त आग्रही मागणी करण्यात आली. यावर डेप्युटी इंजिनिअर यांनी ब्रिज पाडण्या अगोदर दोन्ही बाजूस माहितीचे फलक लावण्यात येतील व वाहतूक पर्यायी रस्त्यावर करण्यात येईल असे सर्वांना सांगितले.
मात्र ठेकेदार यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला न कळवता पर्यायी मार्ग नदीत मातीचा भराव टाकून करण्यास सुरुवात केली आहे. ती पर्यायी व्यवस्था वाहतूक सुरू झाल्यानंतर किती दिवस टिकेल? हा प्रश्नच आहे आणि त्यानंतर आज पासून घाट मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्या एसटी प्रशासनाने बंद केल्या आहेत. हा चार/आठ दिवसात हा पर्यायी मार्ग पूर्ण होईल. तो पर्यंत ब्रिजही पाडले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा दहा-बारा दिवसात सुरू होतील. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास, प्रशासन, जिल्हाधिकारी, बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा ग्रामस्थ व पालक यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे कोल्हापूरला घाट मार्गे जाणाऱ्या गाड्या त्वरित सुरू कराव्यात आणि भविष्यात पर्यायी मार्गाने सुरू ठेवाव्यात अशी आग्रही मागणी फोंडाघाट ग्रामपंचायत व नागरिकांकडून होत आहे. याची त्वरित संबंधित आणि दखल घ्यावी अन्यथा विना नोटीस आंदोलनाचा इशारा फोंडावासीयांनी दिला आहे.













