आखाती देशांत अडकलेल्या १५ जणांची मायदेशी परतण्याची इच्छा; जिल्हा प्रशासन सतर्क

ओरोस (प्रतिनिधी) : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि तात्काळ माघारी येण्याची इच्छा असलेल्या नागरिकांची संख्या पंधरा झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सहाजण दुबई मध्ये, चारजण कुवेत मध्ये, दोनजण कतार तसेच बहारीन, सौदी अरेबिया आणि अबुधाबी या देशातील प्रत्येकी एका जिल्हा वासियांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या हे सर्व नागरिक सुखरूप आहेत,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात राहत असलेल्या नागरिकांची माहिती संकलन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांना नियुक्त करण्यात आले आहे. ३ मार्च पर्यंत ११२ नागरिकांनी आपली माहिती भरली होती. त्यातील १२ जणांना तत्काळ जिल्ह्यात यायचे होते. बुधवारी या आकडेवारीत भर पडली आहे. तत्काळ येण्यासाठी आग्रही असलेल्या नागरिकांची संख्या तीन ने वाढली असून एकूण १५ झाली आहे. तर या देशांत वास्तव्यास असलेल्या आणि माहिती भरलेल्या नागरिकांची संख्याही वाढली असून ती १२५ झाली आहे. दररोज याबाबत माहिती घेतली जात असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.

१५ व्यक्तींना भारतात यायचे आहे. त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. त्यांची माहिती राज्य शासनाने दिलेल्या लिंक मध्ये भरण्यात आलेली आहे. तसेच त्यांना राज्य शासनाने दिलेली https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ही लिंक शेअर केलेली आहे.

तृप्ती धोडमिसे
जिल्हाधिकारी

error: Content is protected !!