वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीच्यावतीने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटना तसेच इतर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा देखभालीअभावी हे कॅमेरे बंद पडल्याने त्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असती, तर अनेक घटनांचा उलगडा होण्यास मदत झाली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात शहरात चोरीच्या काही घटना घडल्या असून, त्या संदर्भातील तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे संशयितांचा माग काढणे कठीण होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन बंद पडलेले कॅमेरे दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली ही यंत्रणा लवकरात लवकर सुरू न झाल्यास गुन्हेगारीला आळा बसणे कठीण होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता महामार्गाच्या कामामुळे केबल तुटल्यामुळे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आहेत. लवकरच आम्ही ते दुरुस्त करून घेणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
ग्राहक संघटनेच्यावतीने प्रा. एस एन पाटील यांच्यासह ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ही नगरपंचायत व पोलीस ठाणे येथे भेट देऊन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.












