देवगड (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी हवालदिल होवून रस्त्यावरची लढाई लढत आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख व काजू बागायतदार यांना हेक्टरी ३ लाख रूपये मदतीसाठी सातत्याने सरकारकडे आर्त हाक देत आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून मोर्चा , आंदोलन , रास्ता रोको यासारख्या आंदोलनात आपली मागणीची तीव्रता दाखवूनही फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी काहीतरी मदत मागतोय मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून एकीकडे कुंभमेळ्यास ३५ हजार कोटी खर्च करत असताना आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदतीसाठी मात्र हात आखडता घेतला आहे.सरकारने फक्त चर्चेच्या फेऱ्या केल्या मात्र मदतीबाबत यांच्या हाताला लखवा मारला आहे. उद्या कोकणातील शेतकरी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली व्यथा मांडणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे त्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकुण न घेता त्यांना आणखीन आर्थिक आरिष्टात टाकले जात आहे.आंब्याचा हंगाम संपत आला तरीही सरकारने अजून पंचनामे केलेले नाहीत , केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाकडे मदतीचा प्रस्ताव सादर केला गेला नाही.
सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघत असून राज्यकर्त्यांना राज्यभर फिरताना याची किंमत मोजावी लागणार हे मात्र निश्चीत. उद्या दुपारी ३.०० वाजता कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी गिरगांव चौपाटीवर एकत्रित येवून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणार आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, महादेव जानकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मराठी भाषा केंद्राचे पवार, स्वाभिमान संघटना अध्यक्ष गंडणवार, गणेश गांवकर आदी उपस्थित होते.












