त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये – मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम
पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही
कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी
कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याच गुन्हेगाराला कधीही साथ दिलेली नाही. कोणाला पाठीशी घातले नाही.आज जो काही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज आणि गांजा मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस रात्र एक करत आहेत. त्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये. असा सज्जड इशारा मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला शिस्त व कायदा सुव्यवस्था हाताळण्यात राज्याला पुढे आणत आहे.कोणताही गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला माहिती आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्या राज्यामध्ये आपली सुटका होणार नाही हे माहित असल्याने कोणतेच गुन्हेगार तशी हिम्मत परत करत नाहीत. अशा पद्धतीची भीती सर्वच गुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र राज्यात बसलेली आहे.
खात्यातील काही अधिकारी हे चुकीचं काम करत असतील तरी त्या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय बारीक लक्ष असते. आमदार म्हणून मंत्री म्हणून आम्ही असंख्य वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्यामध्ये असलेले काही निकृष्ट अधिकारी, भ्रष्टाचारी अधिकारी असतील त्यांना शिक्षा देत असताना आणि जागेवर सस्पेंड करताना स्वतः पाहिलेल आहे आणि अनुभवलेल देखील आहे. जे काही आरोप आमदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांवर केले आहेत त्याबाबतीत आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती पोहोचवणार आहोत, कुठेही चूक झाली असेल तर निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणाला सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे.असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.












