तळेरे (प्रतिनिधी) : भात हे आपल्या कोकणातील प्रमुख पीक आहे. शेतीच्या आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सधनता यावी यासाठी भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक सधन व्हावे असे आवाहन सरपंच रवींद्र शेट्ये यांनी केले. कणकवली तालुक्यातील शिडवणे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत च्या स्वउत्पन्नातील ग्रामनिधीमधून 300 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 किलो वाडा कोलम भात बियाणे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ऐन खरीप हंगामपूर्वी भात बियाणे मिळाल्याबद्दल शेतकरी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शेतकरी यांना वाडा कोलम भात वाटप करताना.












