बांदा (प्रतिनिधी) : आषाढ महिना सुरू असतानाही पावसाने अचानक दडी मारल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाडलोस, न्हावेली, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, शेर्ले, इन्सुली, विलवडे आणि वाफोली परिसरातील भातशेतीची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. अनेक ठिकाणी तरवे लावणीयोग्य होऊनही शेतात पाणी नसल्याने लावणी करता येत नाही. ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावणी पूर्ण केली आहे, त्यांच्या रोपांवरही कोमेजण्याची वेळ आली आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत असून, काही जण मोटरपंपाच्या साहाय्याने तर काही जण पारंपरिक पद्धतीने उपसा करून पाणी शेतात पोहोचवत आहेत. मात्र हे प्रयत्न खर्चिक असून सर्वच शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाहीत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला ट्रॅक्टर, बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती सतावत आहे.
शेतकऱ्याची नजर आकाशाकडे
दरवर्षी पावसावर विश्वास ठेवून शेती करणारा शेतकरी यंदा आकाशाकडे आशेने पाहत आहे. दिवसेंदिवस वाढणारे ऊन आणि कोरडी पडलेली शेते पाहून त्याच्या डोळ्यांतील स्वप्नेही कोमेजू लागली आहेत. “हा पावसाळा आहे की उन्हाळा?” असा हतबल सवाल शेतकरी करत आहे
संकट ओढवण्याची शक्यतावेळीच दमदार पाऊस न झाल्यास यंदाच्या खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत सहकार्य द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. “बळीराजाच्या डोळ्यांत अजूनही आशेचे ढग आहेत; आता फक्त आभाळाने साथ देण्याची गरज आहे,” अशी हळवी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.












