फोंडाघाट मध्ये आंबा नुकसान भरपाई दरवर्षीपेक्षा खूपच कमी ? तर काजूची गेले तीन वर्ष नाहीच —
बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मिळणारी प्रतिकूल हवामानावर आधारित नुकसान भरपाई, यावर्षी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी विमा कंपनीला दिलेल्या स्पष्ट आदेशाने आणि सातत्यपूर्ण आढाव्यामुळे जुलै महिन्यातच बागायतदारांच्या बँक खात्यावर आज रोजी जमा झाली. त्यामुळे फोंडाघाट बागायतदार- शेतकऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत..
मात्र चालू वर्षी आंबा पिकाचे १००% नुकसान झाले असताना, विमा कंपनीने दरवर्षीपेक्षा खूपच कमी रक्कम बँक खात्यात जमा केल्याने बागायतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यातच गेले तीन वर्षे फोंडाघाट भागामध्ये काजू बागायतदारांना विम्याची नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. याबाबत माहिती घेता, प्रतिकूल हवामानाची नोंद विमा कंपनीच्या सदोष व बाधित केंद्रांमुळे चुकीच्या माहितीवर आधारित झाली. त्यामुळे सध्याची अल्प नुकसान भरपाई बागायतदार यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली असल्याचे समजते.
याचा सर्वंकष विचार करून, पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी विमा कंपनी, प्रशासन, शेतकरी ,बागायतदार यांची संयुक्त बैठक घेऊन, प्रतिकूल हवामानावर आधारित आंबा व काजू पिकांची १००% फरकाची नुकसानी भरपाई शेतकरी व बागायतदार यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी अशी आग्रही मागणी केली आहे.












