सिंधुनगरी (प्रतिनीधी) : बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% प्रमाणे व्याजाची रू.१कोटी ९०लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे. सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार व दव पडणे इत्यादी हवामानातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले होते. बागायतदार शेतकऱ्यांनी बागायतीसाठी केलेला उत्पादन खर्चसुद्धा वसूल न झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँकेमार्फत विकास संस्था तसेच थेट स्वरूपात पिककर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या कर्जासाठी लागू असलेल्या कर्ज व्याजदरामध्ये २% प्रमाणे व्याज रिबेट देण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. त्यानुसार दि. ३०/०६/२०२६ अखेर नियमित परतफेड केलेल्या ७३१० सभासदांना एकूण रु. १कोटी ९०लाख रक्कम त्यांच्या सेव्हिंग खाती जमा करण्यात आलेली आहे. सदरची आर्थिक मदत बँकेने आपल्या नफ्यातून दिलेली आहे. बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे.












