झेन जी समोर केंद्र सरकार अखेर झुकलं
(ब्युरो न्यूज) : NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांनी, ‘या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत असं म्हटलं जात होतं. पण आम्ही करुन दाखवलं’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. जर तुम्ही घाबरलात नाही, या सरकारसमोर झुकलात नाही, तर कुणाचाही राजीनामा घेऊ शकता, याचाच हा पुरावा आहे. लोकशाहीत घाबरून राहायचं नसतं. राजीनामा देऊन झाला आहे, पण अजून मीटिंग होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता देशभरात कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याची घोषणा करताना विद्यार्थ्यांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे.
विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी गेल्या दहा दिवसांतील घडामोडींमुळे आपण व्यथित झाल्याचं म्हटलं असून विद्यार्थ्यांचं भविष्य कायदेशीर पेचप्रसंग आणि राजकीय संघर्षात अडकू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटलं आहे की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.
परीक्षा रद्द करून नव्या तारखेला पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचंही ठरवण्यात आलं.
20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकारं, जिल्हा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे 21 जून रोजी परीक्षा यशस्वीरित्या घेता आल्याचं त्यांनी नमूद केलं. परीक्षेत गैरप्रकार उघड झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण जबाबदारी स्वीकारली होती आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार केला होता, असंही प्रधान यांनी म्हटलं आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, या संपूर्ण काळात काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं. गेल्या दहा दिवसांतील घटनाक्रम पाहून मन दुःखी झालं असून हा प्रश्न आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पत्रात त्यांनी आंदोलनांचा थेट उल्लेख करत जंतर-मंतर आणि देशातील सध्याच्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर लढायांमध्ये अडकू नये, विद्यार्थ्यांनी आपला वेळ आंदोलनात न घालवता शिक्षण आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“भारताची युवा शक्ती ही देशाची खरी ताकद आहे. देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही,” असं सांगत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपण पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले असून भविष्यातही राष्ट्रसेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.












