विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानाला, उद्योजकतेला मिळाली चालना; १० ते १५ हजारांची उलाढाल
देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पुरळ-कलंबई येथे दि. ३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, कौशल्यविकास, स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला रानभाजी मेळावा व खाऊ महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाला पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मधुकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पुजारे, उपाध्यक्ष विधी गणेश पुजारे, समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडा केंद्रबल गटाच्या केंद्रप्रमुख ज्योती ब्रम्हदंडे यांनी महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रानभाज्या व विविध खाद्यपदार्थांची माहिती जाणून घेतली.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणाऱ्या विविध स्थानिक रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. प्रत्येक रानभाजीची ओळख, तिचे पौष्टिक मूल्य, आरोग्यदायी उपयोग, औषधी गुणधर्म आणि दैनंदिन आहारातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची नव्याने ओळख झाली.
याचबरोबर इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून प्रत्यक्ष विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन, ग्राहकांशी संवाद साधण्याची कला, संघभावना, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने ग्राहकांना आकर्षित करत उत्कृष्ट विक्री केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मधुकर गुट्टे, पदवीधर शिक्षक रणजित पाटील, पदवीधर शिक्षिका रश्मी साटम, उपशिक्षिका बागुल मॅडम, उपशिक्षक सुभाष रेपाळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले.
दुपारी 1.30 वाजता महोत्सवाची सांगता झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष जीवनातील व्यवहार, उद्योजकता आणि स्वावलंबनाचे महत्त्व अनुभवता आले. या महोत्सवात सुमारे १० ते १५ हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मधुकर गुट्टे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












