२३ मिनिटे २४ सेकंदांत २०७ चित्रे ओळखून मिळवला ‘IBR Achiever’ किताब
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भिरवंडे-बिवणेवाडी येथील श्रीजा नम्रता अतुल राणे या अवघ्या १ वर्षे ८ महिन्यांच्या चिमुकलीने आपल्या विलक्षण स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि निरीक्षणक्षमतेचे दर्शन घडवत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा ‘IBR Achiever’ हा मानाचा किताब पटकावला आहे. श्रीजाने अवघ्या २३ मिनिटे २४ सेकंदांत तब्बल २०७ चित्रे ओळखून त्यांच्याकडे बोट दाखवत हा उल्लेखनीय विक्रम केला. तिच्या या कामगिरीची २७ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पडताळणी व पुष्टी करण्यात आली.
या २०७ चित्रांमध्ये २४ प्राणी, २० फळे, १८ खाद्यपदार्थ, १७ घरगुती वस्तू, १५ स्वयंपाकघरातील वस्तू, १२ भाज्या, १० खेळणी, १० बाथरूममधील वस्तू, १० निसर्गाशी संबंधित गोष्टी, ९ पक्षी, ९ वाहने, ९ वैयक्तिक काळजीच्या वस्तू, ८ इलेक्ट्रॉनिक वस्तू, ८ कपडे, ७ फर्निचरच्या वस्तू, ७ शरीराचे अवयव, ५ ॲक्सेसरीज, ५ लहान मुलांच्या वस्तू आणि ४ शालेय स्टेशनरीच्या वस्तूंचा समावेश आहे.
मोबाईलपासून दूर, पुस्तकांच्या जवळ…
श्रीजाच्या या विक्रमाइतकेच तिच्या पालकांनी केलेले संगोपन आणि संस्कारही कौतुकास्पद आहेत. आज लहान मूल रडले की ते शांत करण्यासाठी सहजपणे मोबाईल हातात देण्याची प्रवृत्ती वाढत असताना, श्रीजाच्या आई-वडिलांनी तिला आतापर्यंत मोबाईल अजिबात दिलेला नाही. तिच्या हातात मोबाईल देण्याऐवजी तिला पुस्तके, खेळणी, आजूबाजूच्या वस्तू आणि निसर्गाचा सहवास देण्यात आला. विशेष म्हणजे श्रीजासाठी आवश्यक असलेली पुस्तकेही मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आली.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी तिच्या आईने लॅपटॉपचा वापर केला; मात्र शिकण्यासाठी श्रीजाच्या हातात मोबाईल दिला नाही. त्यामुळे हा विक्रम केवळ एका चिमुकलीच्या बुद्धिमत्तेचा नसून, जागरूक पालकत्व, योग्य संस्कार आणि मोबाईलऐवजी पुस्तक व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनाचाही विजय म्हणावा लागेल.
लहान वयात मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांच्या जिज्ञासेला पुस्तकांशी, निसर्गाशी, खेळण्यांशी आणि प्रत्यक्ष जगाशी जोडले तर त्यांच्या ज्ञानविश्वाला किती सुंदर दिशा मिळू शकते, याचे श्रीजा हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
चिमुकल्या श्रीजा नम्रता अतुल राणेचे मनःपूर्वक अभिनंदन !
तिच्या पुढील उज्ज्वल आणि यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
तसेच श्रीजाच्या आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विशेष कौतुक ! आपल्या मुलीच्या जडणघडणीत मोबाईलपेक्षा पुस्तकांना आणि प्रत्यक्ष अनुभवांना दिलेले महत्त्व निश्चितच अनेक पालकांसाठी प्रेरणादायी आहे.
श्रीजाच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भिरवंडे गावासाठी तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे !










